Skip to main content
                                  लोणचे खा पण बदनामीपुरते



अखेर ज्या अस्सल मुंबईच्या पावसाची आपण इतके दिवस वाट पाहत होतो तो एकदाचा आलाय. शेतकऱ्यासोबत वेधाशाळेवाल्यांचाही जीव भांड्यात पडलाय. आता सलग दोन दोन दिवस तो कोसळत राहणार. कधी कधी तर ढग इतके दाटून येतात की दिवस आहे की रात्र हा प्रश्न पडतो. या वातावरणात आपला अंगभूत आळस अजूनच वाढतो आणि मस्तपैकी झोपून रहावस वाटतं. या अशा ‘टिपिकल’ पावसाळी वातावरणात पोटाची मात्र पार वाट लागते. अशा वेळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना भूक लागलेली आहे की नाही हेच समजत नाही. आणि समजा काही खाल्लंच तर पोट जड होणे, पोट फुगणे अशी लक्षणं सुरु होतात तर काही जणांना जुलाब लागतात. म्हणून अशा वेळी काय खावं तरी काय? 

आयुर्वेदानुसार सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो त्यामुळे आपल्या शरीरातील पचवण्याची क्षमता (अग्नि) कमी होतो आणि वात वाढतो. म्हणून अशा दिवशी अग्निला वाढवणारा आणि वात कमी करणारा आहार घ्यायला हवा. म्हणजे नेमकं काय खायचं याचं उत्तर चरक संहितेत मिळतं.

                           व्यक्ताम्ल लवणस्नेहं वातवर्षाकुलेहनि I
                           विशेष शीते भोक्तव्यं वर्षासु अनिल शान्तये II

ज्या दिवशी भरपूर पाऊस पडत असेल अशा वेळी व्यक्ताम्ल लवणस्नेहं असा आहार घ्यावा. आता ही काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेल. ज्या पदार्थात अम्ल म्हणजे आंबट, लवण अर्थात खारट चवी मुबलक आहे आणि सोबत भरपूर स्नेह म्हणजे तेल आहे त्याला व्यक्ताम्ल लवणस्नेहं असे म्हणतात. अशा प्रकारच्या आहाराचे उत्तम उदाहरण म्हणजे लोणचे.



काही अन्नपदार्थ कायम बदनाम असतात लोणचे त्यापैकी एक. जगातला कोणताही डॉक्टर तुम्हाला लोणचं खा म्हणून सांगणार नाही. पण आयुर्वेद सांगतो आणि दोन पावलं पुढे जाऊन कधी खायचं कधी नाही, कुणी खायचं कुणी नाही हेही सांगतो. सहसा लोणचं ते बनवतात कच्च्या कैरीपासून म्हणजे अम्ल रस, त्यात अधिक प्रमाणात मीठ असतं म्हणजे लवण रस तसंच लोणचं खराब होऊ नये म्हणून त्यात तीळ किंवा मोहरीचे तेल घालतात सोबतीला लाल तिखट, हळद, मोहरी, हिंग यासारख्या भूक वाढवणाऱ्या आणि पचनाला मदत करणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांची जोड आहे. म्हणूनच लोणचे व्यक्ताम्ल लवणस्नेहयाच उत्तम उदाहरण आहे. याच कारणामुळे आपल्याकडे लोणचे पावसाळ्याच्या सुरवातीला घातले जाते. पावसाळ्यात वाढणाऱ्या वातापासून संरक्षण करणारी ही व्यवस्था. आयुर्वेद आपल्या खाद्यसंकृतीत किती खोलवर रुजलेला आहे याची साक्ष देणारी.  

आता हे लोणचं खायचं किती? पु.ल. देशपांडेच्या ‘गणगोत’ पुस्तकात त्यांनी स्व. गायक अरूण दाते यांचे वडील रामुभैया दाते यांचा एक अनुभव सांगितला आहे. पानात तंबाखू किती घालायचा?  असं विचारल्यावर रामुभैया ‘बस्स चिमुटभर बदनामीपुरता’ असं उत्तर देतात. हाच नियम लोणच्यालाही लागू होतो. लोणचंही ‘बदनामी’पुरते खायचे असते म्हणजे एका वेळी एक फोड इतकेच खायचे असते आणि तेही पावसाळ्यात. ज्यांना अम्लपित्त, पोटात जळजळणे, अल्सर, संडासातून रक्त पडते असे उष्णतेचे त्रास असतील त्यांनी लोणचे खाऊ नये. आणखी एक गोष्ट हे गुण घरी बनवलेल्या लोणच्याचे आहेत. बाजारात मिळणाऱ्या लोणच्यात व्हिनेगार घातलेले असते त्यामुळे ते खाणे योग्य नाही.
तेव्हा
       
पावसाळ्यात लोणचे खा आणि निरोगी रहा.

डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
    

Comments

Popular posts from this blog

Ayush Digestive Solutions Presents Certificate course in Ayurvedic Gastroenterology “Unique opportunity to sharpen your clinical skills in Ayurvedic Gastroenterology” Syllabus ·          History taking & general considerations in Gastroenterology (Ayurvedic & Modern) ·          Oral diseases – Modern diagnostic skills & Ayurvedic treatment approach ·          अम्लपित्त GERD & Beyond  - Detailed samprapti, treatment plan, dietary restrictions ·          Irritable Bowel Syndrome (IBS) – Bread & butter for Ayurvedic physician ·          Inflammatory Bowel Disorders  (Crohn’s disease, Ulcerative colitis) ·          Gall stones – What are strengths & weakness of Ayurvedic treatment ·...
‘मंथ’ for the month शिक्षणविश्वातील ‘ग्लोबल वॉ र्मिंग’ शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला जाऊन विचारा त्याचा किंवा तिचा ‘नावडता’ महिना कोणता ? ९०% जण ‘मार्च’ हे उत्तर देतील. कारण मार्च हा परीक्षेचा महिना. (उरलेल्या १०% लोकांना ऑक्टोबरसुध्दा आवडत नाही.) थंडी संपत आल्याने उन्हाचा ताप वाढत असतो आणि सोबत हा परीक्षेचा ताप सुरु होतो. मग वर्षभर ‘विषयांपासून लांब’ राहिलेले विद्यार्थी अभ्यास ‘सिरीयसली’ घ्यायला लागतात. त्यातूनच सुरु होतात जागरणं आणि ‘जागता पहारा’ देण्यासाठी मदत करणारे चहा, कॉफीसारखे पेय. भरीस भर म्हणून परीक्षेचे पेपरही दुपारच्या वेळेतच असतात. आधीच वाढलेल्या उष्णतेत हे उन्हातून जाणं येणं अजून तापदायक ठरतं. वरील सर्व कारणांमुळे शरीरात उष्णता आणि कोरडेपणा वाढतो म्हणजेच आयुर्वेदाच्या भाषेत वात आणि पित्त दोष वाढतात. त्याचे परिणाम शरीर व मनावर दिसायला लागतात. वेळेवर भूक न लागणे, तोंड येणे, पोटात आग होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, हातपाय गरम वाटणे, ताप आल्यासारखे वाटणे, दिवसा झोप येणे, उत्साह न वाटणे, चिडचिड होणे, अभ्यासावर ‘फोकस’ करता न ये...
आपली तुपली गोष्ट गेल्या आठवड्यात तरुणांमधील वाढत्या आत्महत्या या विषयावर लिहिलेल्या “शब्दावाचून अडले सारे” या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळाला. या आठवड्यात याच विषयाशी संबंधित एका निराळ्या पैलूवर प्रकाश टाकणार आहे. इंटरनेट आणि सोशियल मिडियाची आभासी दुनिया आजच्या तरुणाईला कशी जीवघेणी ठरतेय हे आपण पाहिले. आपण घेत असलेला आहार आपल्या मनावर परिणाम करत असतो. गेल्या ५० वर्षात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप मोठ्या प्रमाणात बदलल्या. हा बदल आपल्या विचारांवर कसा प्रभाव टाकतोय याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. तत्पूर्वी पहिल्यांदा आपण मेंदू या अवयवाची ओळख करून घेऊ. मेंदू – मेंदूला मुंग्या आणणारा अवयव एका वयस्क व्यक्तीच्या मेंदूचे वजन सुमारे १४०० ग्र ॅ म असते. मेंदूमध्ये सुमारे १०००० कोटी चेतापेशी (न्युर ॉ न्स) असतात. सेकंदाला एक या गतीने आपण हे न्युर ॉ न मोजायला सुरुवात केली तर फक्त एका मेंदूतील न्युर ॉ न मोजण्यासाठी ३१७१ वर्ष लागतील. प्रत्येक न्युर ॉ न सुमारे १०००० इतर न्युर ॉ न्सशी जोडलेला असतो. माणसाच्या मेंदूचं वजन शरीराच्या फक्त २.५ % असूनही हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्तापै...