Skip to main content

मधुबालेसाठी ‘मधुशाळा’


ऐका हो ऐका ! रोज सकाळी गरम पाणी आणि मध पिऊन ‘स्लिम’ होणाची स्वप्न बघणाऱ्या ‘मधुबालां’साठी ही खास पोस्ट.



मध हा पदार्थ भारतीयांसाठी नवीन नाही. किंबहुना लहान असताना आपल्यापैकी बहुतांश जणांनी खाल्लेला पहिला गोड पदार्थ म्हणजे मध. आयुर्वेदानुसार मध हे कफाचे सर्वश्रेष्ठ औषध आहे. खोकला झालेला असताना थुंकीतून बाहेर पडणारा चिकट पदार्थ म्हणजे कफ अशी सामान्यांची समजूत असते. आयुर्वेदानुसार कफाला ‘श्लेष्मा’ असेही म्हणतात. श्लेष्मा हा शब्द ‘श्लिष’ या मूळ संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे ज्याचा अर्थ आलिंगन देणे असा होतो. आलिंगनात दोन व्यक्ती जवळ येतात, जोडल्या जातात म्हणून जो शरीरघटक दोन पदार्थांना जोडण्याचे काम करतो त्याला ‘श्लेष्मा’ किंवा ‘कफ’ असे म्हणतात. मध हे अशा चिकट कफाला कमी करणारे औषध आहे.

पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते. या वाढलेल्या आर्द्रतेमुळे आपल्या शरीरातही ओलावा वाढतो असे आयुर्वेदाचे मत आहे. या अतिरिक्त ओलाव्यामुळेच सर्दी खोकल्यासारखे श्वसन संस्थेचे आजार, खरुज, एग्झिमा, फंगल इन्फेक्शन सारखे त्वचाविकार या दिवसात वाढताना दिसतात. शरीरात वाढलेल्या आर्द्रतेला म्हणजेच कफाला कमी करण्याचे काम मध करते. म्हणूनच पावसाळ्यात आपल्या आहारात मधाचा वापर करण्याचा सल्ला महर्षी चरकांनी दिला आहे. (पानभोजन संस्कारान् प्राय: क्षौद्रान्वितं भजेत् I)



मध खायचा म्हटलं की बरेच जण सकाळी उपाशीपोटी गरम पाणी आणि मध घ्यायला सुरुवात करतात जे आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून अत्यंत चुकीचे आहे. आयुर्वेदातील सिद्धांतानुसार मध कधीही गरम करू नये किंवा गरम पदार्थांत टाकून घेऊ नये. इतकेच काय ज्या व्यक्ती सतत उष्णतेच्या संपर्कात असतात त्यांनीही मध घेऊ नये. अशा प्रकारे मधाचे सेवन हे विषाप्रमाणे घातक आहे असे आयुर्वेद सांगतो. तसेच मध पचायला जड असल्याने माफक प्रमाणात खावा असे आयुर्वेद सांगतो. सतत चुकीच्या पद्धतीने आहार घेतलेला आहार व्यवस्थित न पचल्याने ‘आम’ नावाचा विषाप्रमाणे घातक पदार्थ शरीरात साचू लागतो. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने मध खाल्ल्याने तयार होणारा आम हा सर्वात घातक असतो कारण आम पचवण्यासाठी आवश्यक असलेली उष्ण चिकित्सा मधामुळे निर्माण होणाऱ्या आमासाठी करता येत नाही.

आयुर्वेदात सांगितलेल्या या तथ्यांना आता शास्त्रीय आधार उपलब्ध आहे. ‘जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेद’ च्या २०१० च्या अंकात प्रसिध्द झालेल्या शोधनिबंधानुसार मधाला ४७°C च्या वर उष्णता दिल्यास Hydroxymethyl furfuraldehyde (HMF) नावाच्या एका केमिकल चे मधातील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. आधुनिक रसायन शास्रानुसार HMF कन्सरला कारणीभूत ठरू शकते. याचाच अर्थ आज चुकीच्या पद्धतीने घेतलेला मध भविष्यात कदाचित कन्सरसारख्या रोगाला कारणीभूत होऊ शकतो. 

आयुर्वेदानुसार मध आणि पाणी एकत्र घेतल्यास ते वजन कमी करण्यास मदत करते हे खरे असले तरी ते घेण्याची योग्य पद्धत माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. एक चतुर्थांश आटवलेल्या पाण्याला आयुर्वेदात ‘आरोग्यांबु’ असे नाव आहे. हे आरोग्यांबु वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते. म्हणून मध पाणी घेताना प्रथम ४०० मि.लि. पाणी घेऊन ते १०० मि.लि. शिल्लक राहीपर्यंत आटवावे. नंतर ते पाणी कक्ष तापमानाला (Room temperature) येईपर्यंत थांबावे. त्यानंतर त्यात २० ग्रम मध घालून व्यवस्थित मिश्र करावा. यासाठी लागणारे पाणी सकाळीच गरम करावे. रात्री गरम करून ठेवू नये. अशा प्रकारचे मध पाणी सकाळी उपाशीपोटी घेतल्यास कुठलाही दुष्परिणाम न होता वजन कमी होते.

थोर कवी हरीबंशराय बच्चन ‘राह पकड तू एक चला चल पा जायेगा मधुशाला’ असं आपल्या ‘मधुशाला’ या प्रसिध्द कवितेत म्हटले आहे. त्यामुळे आयुर्वेदातील कोणताही सल्ला पाळताना तो आयुर्वेदाच्या परिभाषेत पूर्णपणे समजावून घेणे आवश्यक असतो. नाहीतर अर्धवट माहितीमुळे दुधी भोपळ्याच्या रसासारख्या दुर्घटना होतात व आयुर्वेद विनाकारण बदनाम होतो.
म्हणूनच बारीक होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या ‘मधुबालां’ना आयुर्वेदाचा धडा समजावून देण्यासाठी ही ‘मधुशाळा’.

© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827

हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

Ayush Digestive Solutions Presents Certificate course in Ayurvedic Gastroenterology “Unique opportunity to sharpen your clinical skills in Ayurvedic Gastroenterology” Syllabus ·          History taking & general considerations in Gastroenterology (Ayurvedic & Modern) ·          Oral diseases – Modern diagnostic skills & Ayurvedic treatment approach ·          अम्लपित्त GERD & Beyond  - Detailed samprapti, treatment plan, dietary restrictions ·          Irritable Bowel Syndrome (IBS) – Bread & butter for Ayurvedic physician ·          Inflammatory Bowel Disorders  (Crohn’s disease, Ulcerative colitis) ·          Gall stones – What are strengths & weakness of Ayurvedic treatment ·...
‘मंथ’ for the month शिक्षणविश्वातील ‘ग्लोबल वॉ र्मिंग’ शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला जाऊन विचारा त्याचा किंवा तिचा ‘नावडता’ महिना कोणता ? ९०% जण ‘मार्च’ हे उत्तर देतील. कारण मार्च हा परीक्षेचा महिना. (उरलेल्या १०% लोकांना ऑक्टोबरसुध्दा आवडत नाही.) थंडी संपत आल्याने उन्हाचा ताप वाढत असतो आणि सोबत हा परीक्षेचा ताप सुरु होतो. मग वर्षभर ‘विषयांपासून लांब’ राहिलेले विद्यार्थी अभ्यास ‘सिरीयसली’ घ्यायला लागतात. त्यातूनच सुरु होतात जागरणं आणि ‘जागता पहारा’ देण्यासाठी मदत करणारे चहा, कॉफीसारखे पेय. भरीस भर म्हणून परीक्षेचे पेपरही दुपारच्या वेळेतच असतात. आधीच वाढलेल्या उष्णतेत हे उन्हातून जाणं येणं अजून तापदायक ठरतं. वरील सर्व कारणांमुळे शरीरात उष्णता आणि कोरडेपणा वाढतो म्हणजेच आयुर्वेदाच्या भाषेत वात आणि पित्त दोष वाढतात. त्याचे परिणाम शरीर व मनावर दिसायला लागतात. वेळेवर भूक न लागणे, तोंड येणे, पोटात आग होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, हातपाय गरम वाटणे, ताप आल्यासारखे वाटणे, दिवसा झोप येणे, उत्साह न वाटणे, चिडचिड होणे, अभ्यासावर ‘फोकस’ करता न ये...
डोंबिवली रिटर्न आणि अम्लपित्त डोंबिवली रिटर्न काही गोष्टी शब्दात पकडता येत नाहीत ; त्या अनुभवाव्याच लागतात त्यापैकीच एक म्हणजे लोकलचा प्रवास. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणं हि काय चीज आहे हे मुंबईबाहेरच्या लोकांना कळणे अशक्य आहे. डोंबिवलीसारख्या गर्दीच्या स्टेशनवर तर लोकलमध्ये चढणे म्हणजे वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान मिळण्याइतकेच अवघड आहे. अशा वेळी काही चतुर मंडळी एक युक्ती करतात. समजा एखादी ट्रेन कल्याणहून सुरु होणारी असेल तर ती CST हून   कल्याणला जात असतानाच डोंबिवलीला तिच्यात चढायचे आणि कल्याणला परत जायचे. ट्रेन कल्याणला पोचली कि विंडो सीट पकडून आरामात बसून यायचे. या सर्व प्रकारात थोडा वेळ जातो पण हमखास बसायला मिळते. डोंबिवलीकरांच्या अशा पद्धतीने ‘रिटर्न’ जाण्याचा त्रास कल्याणवाल्यांना होतो. त्यांची हक्काची जागा डोंबिवलीहून रिटर्न आलेल्यांनी घेतल्याने सुरु झालेली भांडणं ‘बा’चा‘बा’ची पर्यंत जातात. अशीच परिस्थिती वेस्टर्न लाईनवर पण उद्भवते. तिकडे नालासोपारा, वसईचे प्रवासी विरार लोकलने रिटर्न जातात. फक्त तेथे हिंदी भाषिक जास्त असल्याने ‘ बाचाबाची ’ ऐवज...